पुणे: पुण्यातील कोंढवा परिसरातून एका विवाहितेच्या कथित छळाचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आल्यानंतर पतीने बेकायदेशीरपणे ‘तिहेरी तलाक’ दिल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर बशीर मुजावर (वय ३३), रेहाना बशीर मुजावर (वय ५६), बशीर मुजावर (वय ६२), रिनाज बशीर मुजावर (वय ३०), सोनू (वय ३५, सर्व रा. उजगाव, कोल्हापूर), तसेच यासीन दिलावर नाईकवाडी (वय ३१) आणि रमजान महामुद सय्यद (वय ६२, रा. रविवार पेठ, कोल्हापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३२ वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, सप्टेंबर २०२२ पासून जून २०२६ पर्यंत सासरच्या मंडळींकडून तिचा सातत्याने शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. विविध कारणांवरून त्रास देणे, मानसिक दबाव टाकणे आणि अपमानास्पद वागणूक देणे असे प्रकार घडल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
तसेच ८ जानेवारी २०२६ रोजी पती समीर मुजावर याने विवाहितेला बेकायदेशीरपणे ‘तिहेरी तलाक’ दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव करत असून, तक्रारीतील आरोपांची पडताळणी करण्यात येत आहे. पोलिसांकडून संबंधित सर्वांची चौकशी सुरू असून तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.







