दिल्ली: नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात झालेल्या विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांना पोलिसांकडून नोटिसा पाठवणे, चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावणे आणि जबाब नोंदवून घेणे अशा प्रकारांच्या तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी केंद्र सरकार आणि संबंधित राज्य सरकारांना कठोर इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांना त्रास देण्याचे प्रकार तात्काळ थांबवावेत, अन्यथा पुन्हा एकदा देशव्यापी आणि मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

अभिजीत दिपके यांनी सांगितले की, आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करणे योग्य नाही. शांततापूर्ण मार्गाने आपला आवाज उठवणाऱ्या तरुणांना पोलिसांच्या माध्यमातून दबावाखाली आणण्याचा प्रयत्न सुरू राहिला, तर कॉकरोच जनता पार्टी पुन्हा व्यापक लोकआंदोलन उभारेल. विद्यार्थ्यांना गुन्हेगाराप्रमाणे वागवण्याऐवजी त्यांच्या भावना समजून घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशातील एका निर्देशाचा उल्लेख करत, त्यातून राज्य सरकारांना विद्यमान एफआयआरवरील तपास सुरू ठेवण्याची मुभा मिळाल्याचे नमूद केले. मात्र, हा आदेश केंद्र सरकारने २५ जुलै २०२६ रोजी विद्यार्थ्यांना दिलेल्या आश्वासनाशी विसंगत असल्याचा दावा त्यांनी केला. आंदोलनकर्त्यांविरोधातील गुन्हे मागे घेतले जातील आणि त्यांना कोणत्याही प्रकारे लक्ष्य केले जाणार नाही, असे सरकारने आश्वासन दिले होते, अशी आठवणही त्यांनी करून दिली.
नीट आंदोलन मागे घेताना कॉकरोच जनता पार्टीने विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची आणि नव्याने कोणतीही कारवाई न करण्याची अट सरकारसमोर ठेवली होती. सरकारने ती मान्य केल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला होता. मात्र, काही राज्यांमध्ये अजूनही विद्यार्थ्यांना चौकशीसाठी बोलावले जात असल्याच्या तक्रारी पक्षाकडे येत असल्याचे सांगत अभिजीत दिपके यांनी सरकारने तातडीने या प्रकरणाची दखल घ्यावी, अन्यथा पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा दिला आहे.






