पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकीकरणाच्या चर्चांवर शरद पवार यांनी स्पष्ट भूमिका घेत विलीनीकरणाची शक्यता फेटाळून लावली असली, तरी दोन्ही बाजूंच्या नेत्यांमधील संवाद पूर्णपणे थांबलेला नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे एकीकरणाचा विषय सध्या थंडावला असला तरी भविष्यात राजकीय परिस्थितीनुसार समीकरणे बदलू शकतात, असे जाणकारांचे मत आहे.

पक्षातील एका ज्येष्ठ खासदाराने दिलेल्या माहितीनुसार, राजकारणात कोणताही निर्णय कायमस्वरूपी नसतो. आज एकीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम दिला असला, तरी भविष्यात परिस्थिती बदलल्यास नव्या घडामोडी घडू शकतात. दोन्ही गटांतील काही वरिष्ठ नेत्यांमध्ये संपर्क कायम असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, शरद पवार गटातील काही लोकप्रतिनिधी अधिकृत कामांच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील नेत्यांची भेट घेत असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षातील तणाव कमी करून तोडगा काढण्याबाबतही काही स्तरावर चर्चा होत असल्याचे सांगितले जात आहे. पार्थ पवार यांच्या पुण्यात झालेल्या वाग्दान समारंभात दोन्ही गटांतील नेत्यांची उपस्थितीही राजकीय चर्चेचा विषय ठरली.
दुसरीकडे, राज्यातील बदलते राजकीय वातावरण, आगामी निवडणुका आणि पक्षातील लोकप्रतिनिधींच्या राजकीय भवितव्याच्या पार्श्वभूमीवर अनेक आमदार आणि खासदार सत्ताधारी पक्षांशी संवाद ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे.
मात्र, बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण होणार नसल्याचे स्पष्ट केले. “दोन्ही पक्षांचे एकत्रीकरण शक्य नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यामुळे सुरू असलेल्या राजकीय चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला असला, तरी पडद्यामागील राजकीय संपर्क आणि भविष्यातील घडामोडींवर सर्वांचे लक्ष कायम आहे.







