पुणे: पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात पूर्वीच्या वैमनस्यातून दोन भावंडांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जात असताना दोघांना अडवून तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले. या प्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी दोघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

या हल्ल्यात आशुतोष नाना क्षीरसागर (वय 27) आणि ऋषिकेश नाना क्षीरसागर (वय 26, दोघे रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी) हे गंभीर जखमी झाले आहेत. तर आरमान समीर शेख (वय 25) आणि शाहरुख उर्फ कल्लू शेख (वय 27, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 जुलै रोजी क्षीरसागर बंधूंच्या एका नातेवाईकाचे निधन झाले होते. त्यामुळे दोघेही सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अंत्यविधीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर परिसरातून जात होते. याच वेळी आरोपींनी त्यांना अडवून पूर्वीच्या वादातून हल्ला केला.
हल्ल्यादरम्यान आशुतोष क्षीरसागर यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करण्यात आला. त्याचवेळी ऋषिकेश याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस तसेच हातावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आशुतोष क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या हल्ल्यामागील नेमके कारण, पूर्वीच्या वादाचे स्वरूप आणि आरोपींच्या हालचालींचा तपास पोलिसांकडून सुरू असून सहायक पोलीस निरीक्षक बसवराज माळी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.







