पुणे : राजगड तालुक्यातील मालवली गावात घडलेल्या धक्कादायक घटनेत ताडीच्या नशेत असलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्या १८ वर्षीय मित्राची गळा दाबून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलांमधील वाढत्या व्यसनाधीनतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

ही घटना रविवारी दुपारी मालवली येथील राजतोरण शाळेजवळील मैदान परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मैदानाजवळ काही तरुणांमध्ये वाद झाला होता. उपस्थितांनी मध्यस्थी करत तो वाद शांत केला आणि सर्वजण तेथून निघून गेले. मात्र काही वेळानंतर विकास सुरेश जाधव (वय १८) आणि अल्पवयीन मुलगा यांच्यात पुन्हा शाब्दिक वाद सुरू झाला.

त्यावेळी अल्पवयीन मुलगा ताडीच्या नशेत असल्याचे सांगितले जात आहे. वाद वाढत गेल्यानंतर त्याने संतापाच्या भरात विकासचा गळा दाबण्यास सुरुवात केली. गळा आवळल्याने विकास बेशुद्ध होऊन खाली कोसळला.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी विकासला तातडीने वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेमुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.
याप्रकरणी रोहन पांडुरंग पवार यांनी वेल्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून संबंधित १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
प्राथमिक तपासात परिसरात दारूबंदी असल्याने काही तरुण आणि अल्पवयीन मुले नशेसाठी ताडीचा आधार घेत असल्याची बाब समोर आली आहे. या घटनेनंतर बेकायदेशीररीत्या उपलब्ध होणाऱ्या नशेच्या पदार्थांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वेल्हे पोलीस करत आहेत.







