पुणे: पुण्यातील नवी पेठ परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान 11 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. आदिती गिते या बालिकेच्या मृत्यूप्रकरणी उपचारात निष्काळजीपणा झाल्याचा ठपका ठेवत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदवण्यात आली असून डॉ. मुकुंद संगमनेरकर, डॉ. गणेश आरेकर, डॉ. श्रीधर जाधव, डॉ. राधा संगमनेरकर तसेच परिचारिका मनीषा शिंदे आणि सरिता सुतार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व चिन्मय नर्सिंग होम हॉस्पिटल येथे कार्यरत असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 22 मे रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजता आदितीला उलट्यांचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तिच्या शरीरातील पाणी कमी झाल्याचे सांगत उपचार सुरू केले. उपचारादरम्यान दोन वेळा सलाईन लावण्यात आले. मात्र रात्री सुमारे 11:50 वाजता पुन्हा सलाईन लावण्यासाठी परिचारिका गेली असता आदिती निपचित अवस्थेत आढळली. त्यानंतर डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेनंतर आदितीचे वडील ॲड. हनुमान गिते यांनी डॉक्टरांवर गंभीर आरोप करत कायदेशीर लढा सुरू केला. ससून रुग्णालयाच्या तज्ज्ञ समितीने दिलेल्या अहवालात उपचारात निष्काळजीपणा झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच उपचारानंतर रुग्णालयातील कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
दरम्यान, डॉक्टर डॉ. मुकुंद संगमनेरकर यांनी आरोप फेटाळत बालिकेला तीव्र डिहायड्रेशन झाले होते आणि तिची प्रकृती आधीच गंभीर होती, असे सांगितले. शवविच्छेदन न झाल्यामुळे मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसल्याचेही त्यांनी नमूद केले. या प्रकरणामुळे खासगी रुग्णालयांच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पुढील तपास सुरू आहे.







