पुणे : प्रेयसीला पैसे देण्यासाठी आणि स्वतःच्या खर्चासाठी पाच लाख रुपयांची गरज असल्याने उत्तर प्रदेशातील एका १९ वर्षीय तरुणाने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. सैन्य भरतीच्या अग्निवीर चाचणीसाठी पुण्यात आलेल्या या तरुणाने कुटुंबीयांकडून पैसे उकळण्यासाठी अपहरणाचा बनाव केला. मात्र, पुणे आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या संयुक्त तपासामुळे काही तासांतच या बनावाचा पर्दाफाश झाला.

ओम प्रकाश गौरीशंकर (वय १९, रा. बांदा, उत्तर प्रदेश) असे या तरुणाचे नाव आहे. तो अग्निवीर भरतीच्या वैद्यकीय चाचणीसाठी पुण्यात आला होता. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ओम प्रकाशला प्रेयसीला देण्यासाठी सुमारे दीड लाख रुपये आणि स्वतःच्या खर्चासाठी आणखी पैशांची गरज होती. मात्र, स्वतःकडे पैसे नसल्याने त्याने आपल्या मोठ्या भावाकडून पाच लाख रुपये मिळवण्याचा कट रचला.

अपहरण झाल्याचे भासवून भावाला फोन
ओम प्रकाशने आपल्या कुटुंबीयांना फोन करून आपले अपहरण झाल्याचे सांगितले. अपहरणकर्त्यांनी सुटकेसाठी पाच लाख रुपयांची मागणी केल्याचे त्याने कुटुंबीयांना सांगितले. कुटुंबीयांचा विश्वास बसावा यासाठी त्याने स्वतःचा रडतानाचा आणि घाबरल्याचे भासवणारा व्हिडिओही तयार करून भावाला पाठवला.

मुलाच्या अपहरणाची माहिती मिळताच कुटुंबीयांनी उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर पोलिसांकडे धाव घेतली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उत्तर प्रदेश पोलिसांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधला.
तांत्रिक तपासातून बनावाचा पर्दाफाश
यानंतर बंडगार्डन आणि खडकी पोलीस ठाण्याच्या पथकांनी तांत्रिक तपास सुरू केला. पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे ओम प्रकाशचा शोध घेतला. त्याचे लोकेशन खडकी परिसरात असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी क्राउन प्लाझा लॉजिंग येथे तपास केला.
पोलिसांनी लॉजमधील संबंधित खोलीत प्रवेश केला असता तेथे कोणतेही अपहरणकर्ते आढळले नाहीत. उलट ओम प्रकाशच खोलीत आरामात बसलेला आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली. चौकशीत स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याचे समोर आले.
या कारवाईत बंडगार्डन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार, सहायक उपनिरीक्षक प्रवीण शितोळे, हवालदार प्रकाश आव्हाड, अंमलदार ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे, माऊली गायकवाड आणि महेश जाधव यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.






