दौंड : बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणात बारामती सत्र न्यायालयाने तीन आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले आहेत. डॉ. सुमंत तुकाराम शितोळे, वाघराव जांभळे आणि सचिन कदम यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, तपासी अधिकाऱ्यांनी आरोपींविरोधात उपलब्ध झालेले सबळ आणि तांत्रिक पुरावे न्यायालयासमोर सादर केले. प्रकरणाचे गांभीर्य आणि तपासातील पुरावे लक्षात घेऊन न्यायालयाने तिन्ही आरोपींचे जामीन अर्ज नामंजूर केले.

या प्रकरणातील वाँटेड आरोपी डॉ. मंदार सुरेश माळी याच्याविरोधातही पोलिसांनी कारवाईचा फास आवळला आहे. अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी त्याने बारामती सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज यापूर्वीच फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे तपास यंत्रणेकडून त्याचा शोध सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची कारवाई करत विशेष तपास पथकाने (SIT) मुख्य आरोपी अण्णासाहेब गिरी याची पत्नी राणी अण्णासाहेब गिरी हिला ८ सप्टेंबर रोजी अटक केली. तिचा या बेकायदेशीर कृत्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे तपासात समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. न्यायालयाने राणी गिरी हिला ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

यवत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या प्रकरणाचा तपास पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या आदेशानुसार विशेष तपास पथकाकडून सुरू आहे. तपासादरम्यान मुख्य आरोपीच्या घरी बेकायदेशीर गर्भलिंग निदानाच्या कृत्यात राणी गिरी हिचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या बेकायदेशीर व्यवहारातून मिळणारी रक्कम तिच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा होत असल्याचेही तपासात समोर आले आहे. तसेच इतर आरोपींच्या बँक खात्यांमधूनही पैशांची देवाणघेवाण झाल्याचे आढळून आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास यवतचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर आणि विशेष तपास पथकाकडून सखोल व तांत्रिक पद्धतीने करण्यात येत आहे. आरोपींमधील आर्थिक व्यवहार, बेकायदेशीर गर्भलिंग निदानाच्या नेटवर्कमधील इतर व्यक्ती आणि या प्रकरणाशी संबंधित पुरावे यांचा तपास केला जात आहे.






