पिंपरी: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका (Ajit Pawar) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांवर जोरदार टीका केली. अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर (Pune Election) शुक्रवारी पिंपरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष योगेश बहल, माजी आमदार विलास लांडे, प्रचारप्रमुख नाना काटे, अजित गव्हाणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सिद्धार्थ बनसोडे यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा आरोप करण्यात आला होता, मात्र तो सिद्ध झाला नाही. त्याचप्रमाणे माझ्यावर जलसंपदा विभागात 70 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप झाला होता, तोही सिद्ध झाला नाही. ज्यांनी माझ्यावर एवढ्या मोठ्या घोटाळ्याचे आरोप केले, त्यांच्यासोबतच मी आज सत्तेत सहभागी आहे, असेही त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढत आहे. पिंपरी-चिंचवड शहराशी माझे नाते 1991 पासून आहे. त्या वेळी शहराने मला खासदार म्हणून निवडून दिले. त्यानंतर शहराच्या विकासकामांना गती मिळाली. 2017 पर्यंत महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. त्या काळात अनेकांना पदे दिली, तरी काही जणांनी पक्ष सोडला, असा आरोप त्यांनी केला.
भाजपवर टीका करताना अजित पवार म्हणाले की, आशिया खंडातील श्रीमंत महापालिका असा पिंपरी-चिंचवडचा गौरव होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली, मात्र महापालिकेला कधीही कर्जबाजारी केले नाही. भाजपच्या काळात मात्र महापालिकेच्या ठेवी कमी झाल्या. विकास दाखवण्यासाठी ठेवी मोडल्या गेल्या आणि कर्जरोखे काढण्यात आले. चांगले रस्ते पुन्हा उखडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली रस्त्यांची अवस्था खराब करण्यात आली. फुटपाथवर अतिक्रमण करून हप्तेवसुली होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. वाहनतळांची योग्य व्यवस्था करण्यात आलेली नाही. निविदांमध्ये रिंग करून रक्कम फुगवली जाते, याचे पुरावे आमच्याकडे आहेत, असा दावा त्यांनी केला. श्वान नसबंदी प्रकरणातही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, मागील वर्षांत 20 हजार नागरिकांना श्वान चावल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. सध्या महापालिकेत मोठ्या प्रमाणावर गैरकारभार सुरू असल्याचा आरोप करत अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला.







