पुणे: महाराष्ट्रातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिकमधील टीसीएस (TCS) कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या शोषण आणि धर्मांतर केल्याचा प्रकार समोर आला असतानाच, आता पुण्यातील हिंजवडी येथील ‘इन्फोसिस बीपीएम’ कॅम्पसबाबत सोशल मीडियावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. व्हायरल पोस्टमध्ये महिला कर्मचाऱ्यांचा छळ केला जात असल्याचे समोर आले आहे.

गेल्या काही दिवसांत ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर इन्फोसिसच्या पुणे कॅम्पसमध्ये महिलांशी गैरवर्तन होत असल्याच्या पोस्ट फिरत होत्या. या प्रकरणाची दखल खुद्द राज्य सरकारने घेतली आहे. मंत्री नितेश राणे यांनी याप्रकरणी कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. जरी या पोस्ट्स नंतर हटवण्यात आल्या असल्या, तरी कंपनीच्या अंतर्गत शिस्तीबाबत चर्चा सुरू झाली आहे.

यावर स्पष्टीकरण देताना इन्फोसिसने म्हटले आहे की, “आमच्याकडे कोणत्याही प्रकारच्या भेदभावासाठी ‘झिरो टॉलरन्स’ धोरण आहे. कर्मचाऱ्यांनी न घाबरता तक्रार करावी यासाठी आम्ही ‘स्पीक अप’ला प्रोत्साहन देतो.” सध्या कंपनीने या प्रकरणाच्या चौकशीसाठी अंतर्गत समितीला चौकशीचे आदेश दिले आहेत.
आयटी क्षेत्रातील कोणत्याही कर्मचाऱ्याला छळवणुकीचा सामना करावा लागत असेल, तर त्यांनी कंपनीच्या ‘Internal Complaints Committee’ (ICC) कडे दाद मागावी. त्या व्यतिरिक्त, तुम्ही ‘दामिनी पथकाची’ मदत घेऊ शकता. दरम्यान, नाशिकच्या टीसीएसमध्ये जे घडले तसेच काही ‘इन्फोसिस बीपीएम’ कॅम्पसमध्येही घडत होते का? हे अंतर्गत समितीने केलेल्या चौकशीनंतर समोर येईल.







