पुणे: पुण्यात होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारकडून पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली. यासह साहित्य क्षेत्रातील विविध उपक्रमांसाठी एकूण 18 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उदय सामंत यांनी सांगितले की, शंभराव्या साहित्य संमेलनासाठी पाच कोटी रुपये देण्यात येतील. तसेच या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणाऱ्या 99 नांदी संमेलनांसाठी पाच कोटी रुपये, राज्यातील 13 विद्यापीठांमध्ये होणाऱ्या विद्यार्थी साहित्य संमेलनांसाठी प्रत्येकी 25 लाख रुपयांप्रमाणे सुमारे चार कोटी रुपये दिले जाणार आहेत. याशिवाय परदेशात आयोजित होणाऱ्या 12 साहित्य संमेलनांसाठी कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीतून दोन कोटी रुपये उभारले जाणार असून महाराष्ट्र साहित्य परिषदेला एक कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. पुस्तक दालने आणि इतर साहित्यिक उपक्रमांसाठीही निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठी साहित्याचा जागतिक स्तरावर प्रसार व्हावा यासाठी राज्य सरकार नवीन उपक्रम राबविणार असल्याची माहितीही सामंत यांनी दिली. साहित्याच्या अनुवादासाठी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने विशेष अनुवाद समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीमार्फत इतर भाषांतील साहित्य मराठीत तसेच मराठी साहित्याचे इतर भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.

यावेळी राजकीय घडामोडींवरही उदय सामंत यांनी भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण झाले तरी शिवसेनेवर त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत एकनाथ शिंदे हे महत्त्वाचे नेते असून ते राष्ट्रीय पातळीवर प्रभावीपणे काम करत असल्याचा दावा त्यांनी केला.
यावेळी राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, कार्यवाह सुनील महाजन तसेच समर्थ युवा फाउंडेशनचे विश्वस्त राजेश पांडे उपस्थित होते.







