लोणी काळभोर, ता. 5: हडपसर (Hadapsar) येथील एका संस्थेने शेतकरी, उद्योजक, महिलावर्ग व सर्वसामान्य नागरिकांना दहा महिन्यात दामदुप्पट रकमेचे आमिष दाखवून 4 हजारहून अधिक कोटींची माया बेकायदा गोळा केली आहे. तर संबंधित संचालकाने त्याच्याकडे 4 हजार 800 कोटींहून अधिक मालमत्ता असल्याचा दावा स्वत: व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करून केला आहे. तर सबंधित संस्थेच्या अनधिकृत कारभाराबाबत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी तक्रार देऊन देखील अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही. तर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) व आरबीआयने चौकशीसुद्धा केली नसल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. त्यामुळे संबंधित संचालकाचे चांगलेच फावले असून तो घाशा गुंडाळून पळून गेल्यानंतर प्रशासन कारवाई करणार का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे एका संघटनेनी संबधित संस्थेच्या विरोधात आंदोलन करण्याची परवानगी मागितली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन त्या संस्थेच्या विरोधात आंदोलन करण्याची परवानगी देईल? की या प्रकरणात आपली भूमिका काय मांडेल? हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
हडपसर (पुणे) येथील एका बोगस संस्थेने नागरिकांना फसवण्यासाठी मार्केटिंगचे एक नवीन षडयंत्र रचले आहे. कंपन्यांनी कमिशनचे लालच देऊन एजंट लोकांच्या नियुक्या केल्या आहे. या संस्थेतील एजंट लोकांनी नवनवीन फंडे वापरून या बोगस योजना राज्यभर राबविल्या आहेत. या मार्केटिंग भूलभुलैय्यामध्ये लाखो गुंतवणूकदार अडकले असून त्यांनी 4 हजार कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र या संस्थेच्या कोणत्याही योजना अधिकृत नसून कधीही बंद पडू शकतात. त्यामुळे हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आर्थिक फसवणुकीचा घोटाळा उघड होऊ शकतो.
शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना हेरून अल्पावधीत दामदुप्पट व प्रतिमाह 5 हे 10 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले आहे. शेतकऱ्यांना दहा महिन्यात दामदुप्पट परतावा देण्याचा दावा केला आहे. या अमिषाला महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बळी पडले असून त्यांनी या फसव्या योजनेत हजारो कोटींची गुंतवणूक केली आहे. संबंधित कंपन्यांनी गुंतवणूकदारांकडून करोडो रुपयांची गुंतवणूक करून घेतली आहे. मात्र हा पैसा जातो कुठे? अथवा या पैशाचे काय केले जाते? याचा अद्यापपर्यंत कुणालाही थांगपत्ता लागलेला नाही. परंतु, कंपनीच्या संचालकांची मात्र संपत्ती 4 हजार 800 कोटींहून अधिक रुपयांची झालेली आहे.
दरम्यान, या संस्थेचा फसवणुकीचा हा एक स्कॅम असून संचालक पैसे गुंडाळून कधीही गायब होऊ शकतात. असे जर झाले हजारो शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येतील? तर अनेकांचे संसार उध्वस्त होतील. त्यामुळे प्रशासनाने लवकर या संस्थेची चौकशी करून संबंधितावर त्वरित कारवाई करावी. अशी मागणी एकीकडे जोर धरू लागली आहे. तर दुसरीकडे कारवाई का केली जात नाही? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे संबंधित कंपनीच्या संचालकांवर प्रशासन काय कारवाई करणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांना इम्पोर्ट-एक्स्पोर्टचे गाजर
हडपसर येथील एका ठगाने शेतकऱ्यांना शेतातील माल इम्पोर्ट-एक्स्पोर्टच्या नावाखाली चांगली किंमत मिळवून देतो. असे म्हणून जादा नफ्याचे आमिष दाखविले आहे. एवढेच नाही तर संबंधित संचालकाने नागरिकांचा विश्वास बसावा म्हणून सर्वांचे करारदेखील करून घेतले आहेत. मात्र या कराराच्या आडून शेतकरी व गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे गाजर दाखवत बेकायदेशीर निधी संकलित करण्याचे काम दलालामार्फत साखळी पध्दतीने संबंधित संस्था करत आहे.
या फसव्या स्किममध्ये हजारो शेतकरी व नागरिकांचा आर्थिक श्वास गुदमरला आहे. या संस्थेला शासनाची कुठलीही अधिकृत परवानगी नसतानादेखील संस्थेने आरबीआयच्या आर्थिक नियमांच्या निकषांना फाट्यावर मारले आहेत. या संस्थेने सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत बँका व खाजगी वित्तीय संस्थेच्या नाकावर टिच्चून आर्थिक कलेक्शन ठेवून करोडो रुपये गोळा केले आहेत. त्यामुळे हडपसरमधील या ठगाची नागरिकांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.







