पुणे : “मतदारयादीतील घराघरांत (Udhhav Thackeray) पोहोचून बोगस मतदार शोधणे आणि (Shivsena) प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी असे (Pune News) मतदार आढळल्यास त्याच्या कानाखाली आवाज काढणे, हे प्रत्येक बूथ प्रमुखाचे तसेच शिवसैनिकाचे कर्तव्य आहे,” असे स्पष्ट आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पुण्यातील संवाद मेळाव्यात केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले.
शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांच्या या संवाद मेळाव्यात ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत, आमदार सचिन अहिर, आदित्य शिरोडकर, मिलिंद नार्वेकर, हर्षल प्रधान, महिला आघाडीच्या स्नेहल आंबेकर, मेघना काकडे, लतिका पाष्टे, शिवसेना उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक, राज्य संघटक वसंत मोरे, शहरप्रमुख संजय मोरे आणि जिल्हाप्रमुख उल्हास शेवाळे यांसह वरिष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, “प्रत्येक शाखेत गटप्रमुख असणे आवश्यक आहे. शाखा ही फक्त कागदावर न राहता प्रत्यक्षात जनता दरबार म्हणून काम करणारी असावी. नागरिकांच्या समस्या सोडवणे, स्थानिक प्रश्नांवर लक्ष ठेवणे आणि दररोज शाखेत हजेरी लावणे हे प्रत्येक शिवसैनिकाचे प्राथमिक कर्तव्य आहे. सत्ता नसली तरी शाखा आणि जनता यांच्यातील नाळ तुटता कामा नये. शाखांना नियमित भेट देणे, पदाधिकाऱ्यांचे काम तपासणे आणि लोकांशी थेट संपर्क ठेवणे हे संघटनेच्या टिकावासाठी अत्यावश्यक आहे.”
ते पुढे म्हणाले की, जिंकायचे असल्यास हरलेल्या मानसिकतेने नव्हे, तर जिंकण्याची ईर्षा आवश्यक आहे. मजबूत शाखा आणि सक्रिय गटप्रमुखांशिवाय विजय मिळवणे शक्य नाही. युतीमधील जागावाटपामुळे पुण्यातील दौरे काहीसे कमी झाले असल्याचे कबूल करत ठाकरे म्हणाले, “आता मात्र वरचेवर पुण्यात येईन. कार्यकर्त्यांना उत्साह मिळावा, यासाठी प्रत्यक्ष संवाद महत्त्वाचा आहे.” अजित नागरी पतसंस्थेच्या महिला मेळाव्यातही त्यांनी पुणेकर महिलांशी संवाद साधला.
महापालिकेच्या गेल्या निवडणुकीचा संदर्भ देत त्यांनी कार्यकर्त्यांना इशारा दिला : “त्या वेळी माझ्या सभेला न्यू इंग्लिश स्कूल मैदानावर प्रचंड गर्दी होती. त्याआधी मुख्यमंत्र्यांची सभा रिकाम्या खुर्च्यांमुळे रद्द झाली होती. त्यामुळे आपण शंभर टक्के जिंकणार, असा विश्वास दिला गेला. मात्र निकाल उलट लागला – रिकाम्या खुर्च्या आपल्या नशिबी आणि भरलेल्या खुर्च्या त्यांच्या नशिबी गेल्या. त्यामुळे केवळ उत्साहाच्या भरात हुरळून जाऊ नका, अन्यथा घात होईल.”
“सभेला हजारो लोक आले तरी विजय निश्चित होत नाही. संघटनेची मुळे घट्ट नसतील, गटप्रमुख सक्रिय नसतील, शाखा कार्यरत नसेल तर कितीही गर्दी करूनही निकाल विरोधकांच्या बाजूने लागू शकतो. प्रत्येक शाखेत गटप्रमुख हवा, जो नियमित कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवेल आणि बूथ पातळीवर संघटना मजबूत करेल. त्याशिवाय आपल्याला हवे ते यश मिळणार नाही,” असे ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.
ठाकरे यांच्या या भाषणानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी “पुढील निवडणुका जिंकण्यासाठी काटेकोर तयारी करण्याची” प्रतिज्ञा घेतली. स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन विशेष महत्त्वाचे मानले जात आहे.







