पुणे: पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणी घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम संजय काकडे यांच्या बिनविरोध निवडीमागे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांची महत्त्वाची भूमिका असल्याची चर्चा आहे. (Pune Politics)

सुरुवातीला विक्रम काकडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून श्रीकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र अर्ज माघारीच्या अंतिम टप्प्यात अचानक समीकरणे बदलली.
मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम काकडे यांचे वडील आणि माजी खासदार संजय काकडे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी संपर्क साधून पुण्यातील निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंती केली होती. या विनंतीनंतर शरद पवार यांनी स्वतः पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांच्याशी संपर्क साधल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे, उमेदवारी देणारे पक्षाध्यक्ष स्वतःच उमेदवाराला अर्ज मागे घेण्याच्या सूचना देतात, ही बाब राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. शरद पवार यांच्या सूचनेनंतर श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्याआधी भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांनीही माघार घेतली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनीही अर्ज मागे घेतल्याने विक्रम काकडे यांचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला.
पुण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे वर्चस्व असतानाही संभाव्य राजकीय संघर्ष टाळण्यासाठी विविध स्तरांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. या सर्व घडामोडींमध्ये शरद पवार यांच्या एका फोननंतर राजकीय चित्र झपाट्याने बदलल्याचे पाहायला मिळाले.
अखेर सर्व प्रमुख प्रतिस्पर्धी माघारी घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम संजय काकडे यांची पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या निकालानंतर पुण्यातील राजकारणात शरद पवार यांच्या हस्तक्षेपाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.







