पुणे: राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई, पुणे आणि कोकणासह अनेक ठिकाणी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदी येथे इंद्रायणी नदीला मोठा पूर आला असून, पूरामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पूरामुळे इंद्रायणी नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. तसेच अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरल्याने नागरी सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आळंदीच्या पुनर्बांधणीसाठी १० कोटी रुपयांच्या विशेष निधीची घोषणा केली आहे.

या निधीतून पाणीपुरवठा व्यवस्था, जलशुद्धीकरण केंद्र, रस्ते, पूल, पथदिवे, सार्वजनिक स्वच्छतागृहे तसेच इतर नागरी सुविधांची तातडीने दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णयही जारी करण्यात आला असून, संबंधित विभागांना कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदीत मोठ्या प्रमाणावर वारकरी दाखल होत असतात. मात्र, सध्याची पूरस्थिती लक्षात घेता मंदिर प्रशासनाने वारकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. पूर ओसरेपर्यंत आणि परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित होईपर्यंत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाकडून पूरग्रस्त भागात मदतकार्य सुरू असून, नागरिक आणि वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. तसेच परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.







