PMC Election : पुण्याच्या राजकारणात सध्या नेमकं काय सुरू आहे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली असतानाही सत्ताधारी महायुती आणि विरोधकांमधील जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असताना, आज पुण्यात घडणाऱ्या घडामोडींनी राजकीय वातावरण चांगलंच तापवलं आहे. (PMC Election)

महापालिका निवडणूक जाहीर होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र प्रत्यक्षात भाजप आणि शिवसेनेतील जागावाटपावरून अद्याप एकमत झालेलं नाही. हा तिढा सोडवण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थी केली, पण त्यालाही यश आलं नाही.
या पार्श्वभूमीवर पुण्यातील शिवसेनेचे बडे नेते रवींद्र धंगेकर थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. धंगेकर हे पत्नी आणि मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही असून, भाजपकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी अजित पवारांकडे धाव घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता पुण्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि शिवसेना एकत्र येणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान, पुण्यातील महायुतीत जागावाटपावरून नाराजीचं नाट्य उघडपणे दिसून आलं. भाजपकडून शिवसेनेला अवघ्या १२ जागांचा प्रस्ताव दिला गेल्याने शिवसैनिकांमध्ये असंतोष पसरला. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी याबाबत थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. त्यानंतर शिंदे यांनी उदय सामंत यांच्याकडे पुण्यातील जागावाटपाची जबाबदारी सोपवली.
उदय सामंत यांनी शिवसेनेला अधिकाधिक जागा मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले, तर नीलम गोऱ्हे यांनी भाजपसमोर ६० जागांचा प्रस्ताव मांडला. मात्र तरीही दोन्ही पक्षांमध्ये सहमती होऊ शकलेली नाही. उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम टप्पा जवळ येऊनही चित्र स्पष्ट न झाल्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता वाढली आहे.
याच पार्श्वभूमीवर रवींद्र धंगेकर यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात जागावाटपाबाबत चाचपणी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपकडून “सन्मानपूर्वक” जागा न मिळाल्याने शिवसेनेकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला प्रस्ताव देण्यात आला आहे. रवींद्र धंगेकर यांनी अजित पवारांसमोर २५ ते ३० जागांचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे. आता हा प्रस्ताव अजित पवार मान्य करतात का, आणि पुण्यात महायुतीचं समीकरण कसं बदलतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अंतिम आणि अधिकृत निर्णय जाहीर होईपर्यंत पुण्याच्या राजकारणात सस्पेन्स कायम राहणार आहे.







