पोपट पाचंगे

रांजणगाव गणपती: शिरूर तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असल्याने कोट्यावधी रुपयांच्या कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. तालुक्यात मागील वर्षी बाजरी, गहू, हरभरा, तुर व मका आदि नगदी पिके चांगली झाली. विहीर व कुपनलिकेचा भरोसा नसल्याने कधी नव्हे ते तालुक्यात उन्हाळी कांद्याची विक्रमी लागवड झाली आणि उत्पादन देखील भरघोस झाले. हजारो हेक्टर क्षेत्रातील कांदा शेतात असतानाच सुरु झालेला अवकाळी पाऊस थांबायचे नाव घेत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.

तालुक्यात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामाचे पूर्वनियोजन काहीसे बिघडले आहे. मात्र या पावसामुळे जमिनीत निर्माण झालेला ओलावा लक्षात घेता काही पिकांसाठी परिस्थिती अनुकुल ठरली आहे.
दरम्यान, अवकाळी पावसामुळे काढणीस आलेल्या भुईमूगाला बुरशीचा धोका वाढला आहे. शेंगा काळ्या पडत असून, मोड येण्याची शक्यता आहे. उन्हाळी बाजरी अद्याप शेतात उभी आहे. पिकांची मागणी घटल्यामुळे दर कोसळूले आहेत. दरम्यान, तालुक्यात समाधानकारक पाऊस पडत असल्याने विहिरी व तलावात पाणी येऊ लागले आहे. तर छोटे बंधारे भरुन ओसंडून वाहू लागले आहेत.
सर्वाधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. हंगामपूर्व पाऊस झाल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असले तरी या पावसामुळे कांद्याचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. आगामी मान्सून आगमनापूर्वी सर्व कामे उरकण्यासाठी शेतकरी पावसाच्या विश्रांतीची आतुरतेने वाट पहात आहे, असे प्रगतिशील शेतकरी संतोष झंजाड यांनी सांगितले.







