पुणे: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 3 ते 7 जुलैदरम्यान महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. काही भागांमध्ये अतिवृष्टीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र-कर्नाटक किनारपट्टीदरम्यान ऑफ-शोअर ट्रफ सक्रिय असून वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र पुढील दोन दिवसांत अधिक प्रभावी होण्याची शक्यता असल्याने राज्यातील पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नदीकाठ, डोंगराळ भाग आणि सखल परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक नसल्यास पावसाच्या काळात प्रवास टाळावा, असेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेड, गुहागर आणि दापोली परिसरात जोरदार पाऊस सुरू असून काही सखल भागांत पाणी साचले आहे. खेड येथील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडल्याची माहिती समोर आली आहे.
नाशिक जिल्ह्यातही महिनाभराच्या विश्रांतीनंतर कळवणच्या पश्चिम भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून भात लागवड आणि खरीप पिकांच्या पेरणीला वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याने आणि कच्च्या घरांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.






