पुणे: पुण्यातील जैन समाजाच्या (Murlidhar Mohol) ट्रस्टच्या मालकीच्या जमिनीवरून (Pune News) निर्माण झालेल्या वादात आता राजकीय रंग भरू लागला आहे. या प्रकरणात माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, एबीपी माझाच्या रिअॅलिटी चेकनुसार, या जागेच्या विकासाशी सध्या मुरलीधर मोहोळ यांचा कोणताही व्यवसायिक संबंध नसल्याचे कागदपत्रांमधून स्पष्ट झाले आहे.

जैन समाजाने केलेल्या आरोपांनुसार, पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील जैन बोर्डिंग हाऊसची जागा विश्वस्तांनी बेकायदेशीरपणे विकली आहे. या जागेचा गैरवापर करून जमीन हडपल्याचा आरोप समाजाने केला आहे. त्यांनी या प्रकरणी आंदोलनही केलं असून, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि दोन बिल्डरांनी संगनमताने ही जमीन हडप केल्याचा दावा केला. याच पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी सार्वजनिक सभेत मोहोळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत कठोर वक्तव्य केले.

तथापि, या प्रकरणातील कागदपत्रांचा तपास घेतल्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार, जैन समाजाची ही जागा बांधकाम व्यावसायिक विशाल गोखले यांना 2025 मध्ये विकासासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मोहोळ आणि गोखले हे 2021 पासून व्यवसायिक भागीदार होते, मात्र फेब्रुवारी 2025 मध्ये मुरलीधर मोहोळ यांनी त्या भागीदारीतून अधिकृतपणे माघार घेतली होती. त्यामुळे सध्या त्यांच्या आणि गोखले यांच्या मध्ये कोणतेही व्यावसायिक नाते अस्तित्वात नाही, असे नोंदींवरून दिसून येते.

जैन बोर्डिंग हॉस्टेलचा हा वाद नवीन नाही. पुण्यातील शिवाजीनगर भागात असलेल्या या जागेवर दिगंबर जैन बोर्डिंग आणि श्वेतांबर जैन बोर्डिंग अशी दोन स्वतंत्र वसतिगृहे आहेत. 1958 साली हिराचंद नेमचंद दोषी यांनी या वसतिगृहाची उभारणी केली होती. काही महिन्यांपूर्वी विश्वस्तांनी या जागेचा नवीन विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला, मात्र समाजातील काही सदस्यांनी त्याला विरोध केला. विरोधकांच्या मते, ही जागा जैन समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी राखीव ठेवण्यात आली होती आणि तिचा व्यावसायिक उपयोग करणे हे विश्वासघाताचे कृत्य आहे.
दरम्यान, जैन समाजाच्या सदस्यांचा आरोप आहे की, या जागेची विक्री धर्मादाय आयुक्तांच्या मंजुरीने झाली असली तरी नियम आणि कायद्यांची पायमल्ली करण्यात आली आहे. विक्रीचा व्यवहार गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत करण्यात आला असून, त्यामुळे या व्यवहाराची चौकशी व्हावी, अशी मागणी समाजाकडून करण्यात आली आहे.
या वादामुळे पुण्यातील धार्मिक आणि राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे जैन समाज न्याय आणि पारदर्शकतेची मागणी करत आहे, तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्वतःचा या व्यवहाराशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिस आणि धर्मादाय विभाग या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.







