पुणे : जीबीएसने घातलेल्या थैमानानंतर पुणे महानगर पालिका सक्रिय झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्यांच्या टाक्यांभोवती सीमाभिंत, सुरक्षारक्षकांसाठी केबिन तसेच आजूबाजूचा परिसर सुशोभित करण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला आहे. यासाठी ३५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार असून पुढील काही दिवसांत या कामाची निविदा काढली जाणार आहे. यामुळे आता सर्व पाण्याच्या टाक्यांवर सुरक्षारक्षक नेमले जाणार आहेत. शहरातील २७ टाक्यांसाठी हा खर्च केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
सिंहगड रस्ता परिसरातील खडकवासला, किरकटवाडी, धायरी, नांदेड, आंबेगाव परिसरात गुईलेन बॅरी सिंड्रोम या आजाराचे रुग्ण दोन महिन्यांपूर्वी मोठ्या प्रमाणात आढळून आले होते. या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाणी दूषित असल्याने या आजाराचे रुग्ण वाढत असल्याचा आरोप ग्रामस्थांनकडून करण्यात आला होता. त्यानंतर महापालिकेने या विहिरीवर लोखंडी जाळ्या टाकून विहिरीत कचरा जाऊ नये, याची व्यवस्था केली होती.

जीबीएस रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या सर्व टाक्या स्वच्छ करण्याची मोहीम पुणे महापालिकेकडून हाती घेण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या शहरात १५५ पाण्याच्या टाक्या असून त्यापैकी निम्मा टाक्यांना सुरक्षारक्षक नाहीत. तसेच सुरक्षेसाठी सीमाभिंतही नाही. यामुळे या टाक्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून शहरातील विविध भागांतील २७ पाण्याच्या टाक्यांभोवती सहा फुटांची सीमाभिंत, सुरक्षारक्षकांची केबिन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या केबिनजवळ स्वच्छतागृहाची सुविधा तयार केली जाणार असून पाण्याच्या टाक्यांच्या परिसरात रिकामी जागा असेल, तेथे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या पाण्याच्या टाक्यांभोवती सहा फुटांची सीमाभिंत, सुरक्षारक्षकांची केबिन तसेच या केबिनजवळ स्वच्छतागृहाची सुविधा तयार केली जाणार आहे. या कामासांठी ३५ कोटींची निविदा पाणीपुरवठा विभागाच्या वतीने काढली जाणार आहे.
नंदकिशोर जगताप, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख, पुणे महानगर पालिका







