आदित्य बोराटे

इंदापूर : हैदराबादहून गांजाची तस्करी करून हा गांजा बारामती तालुक्यात विक्रीस आणणाऱ्या टोळीचा वालचंदनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीकडून 100 किलो गांजा आणि एक होंडा सिटी कार असा 29 लाख 98 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चार जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी दिली.
फिरोज अजीज बागवान,मंगेश ज्ञानदेव राऊत,अश्रम अजित सय्यद आणि प्रदीप बाळासो गायकवाड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून हे चौघेही बारामती तालुक्यातील आहेत.यामधून गांजा तस्करीच आंतरराज्य रॅकेट उघड होण्याची शक्यता वालचंदनगर पोलिसांनी वर्तविली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,तेलंगणा मधील हैदराबादहून चार चाकी गाडी मधून गांजा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती वालचंदनगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे इंदापूरच्या पश्चिम भागातील कळंब वालचंदनगर व लासुर्णे परिसरामध्ये पोलिसांनी सापळा लावत सिने स्टाईलने छापा टाकत ही कारवाई केली आहे.
सिनी स्टाईलने पोलिसांनी पाठलाग करून MH 12 DY 2012 ही होंडा कंपनीची होंडा सिटी कार ताब्यात घेतली. गाडीची तपासणी केली असता गाडीच्या डिकीमध्ये दोन प्लास्टिकच्या बॅगमध्ये 24 लाख 98 हजार 500 किमतीचा 99 पूर्णांक 94 किलो वजनाचा गांजा पोलिसांनी हस्तगत केला आहे. तसेच 5 लाख रुपये किमतीची ही चार चाकी गाडी देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याचवेळी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
गुन्ह्याच्या तपासा दरम्यान फरार असलेल्या तीन आरोपी पैकी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. आतापर्यंत या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आले आहे.सदर आरोपींना इंदापूर प्रथम वर्ग न्यायालयाने 12 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली असून याचा सखोल तपास पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे करीत आहेत.
सदरची कामगिरी सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुर्दशन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, पोलीस हवालदार गणेश काटकर,उत्तम खाडे, शैलेश स्वामी, गुलाबराव पाटील, किसन बेलदार, सचिन गायकवाड, शरद पोफळे, महेश पवार, पोलीस अंमलदार अभिजीत कळसकर, गणेश वानकर, राहुल माने, ओंकार कांबळे यांनी केली आहे.







