मुंबई: आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला ‘धुरंधर २’ हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. अवघ्या 11 दिवसांत 1000 कोटींचा आकडा पार करणाऱ्या या सिनेमाने आता 1350 कोटींच्या कमाईसह नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. मात्र, या अफाट यशासोबतच एका विचित्र मागणीमुळे हा सिनेमा सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला आहे.

‘धुरंधर २’ चे कथानक पाकिस्तानातील एका भारतीय गुप्तहेराच्या साहसावर आधारित आहे. पाकिस्तानात या सिनेमावर अधिकृत बंदी असली, तरी तिथल्या ‘लियारी’ (कराची) भागातील नागरिक लपून-छपून हा सिनेमा पाहत आहेत. विशेष म्हणजे, लियारीतील रहिवाशांनी आता दिग्दर्शक आदित्य धर यांच्याकडे सिनेमाच्या एकूण कमाईपैकी 80 टक्के वाटा मागितला आहे.
पाकिस्तानातील सध्याच्या भीषण आर्थिक परिस्थितीचा दाखला देत, तिथल्या नागरिकांनी रस्त्यांची बांधणी आणि गटारांची झाकणे बसवण्यासाठी आदित्य धर यांनी 500 कोटी रुपये द्यावेत, अशी अजब मागणी केली आहे. “आमच्या भागाचे चित्रण करून तुम्ही पैसे कमावले आहेत, तर आमच्या विकासासाठी हा निधी द्यावा,” असा सूर तिथल्या स्थानिकांनी लावला आहे.







