नवी दिल्ली: भारताच्या भविष्याची दिशा ठरवणारी सर्वात मोठी प्रशासकीय प्रक्रिया म्हणजेच ‘जनगणना’ आज, 1 एप्रिल 2026 पासून अधिकृतपणे सुरू होत आहे. तब्बल 15 वर्षांच्या प्रदीर्घ अंतरानंतर होणारी ही जनगणना अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. विशेष म्हणजे, यंदाची संपूर्ण प्रक्रिया कागद-पेनऐवजी ‘डिजिटल’ पद्धतीने पार पडणार असून त्यात प्रथमच ‘लीव्ह-इन रिलेशनशिप’ आणि ‘ओबीसी’ (OBC) डेटाशी संबंधित महत्त्वाचे बदल पाहायला मिळणार आहेत.

दोन टप्प्यांत होणार माहितीचे संकलन
ही महाजनगणना प्रामुख्याने दोन टप्प्यांत विभागली गेली आहे:
१. पहिला टप्पा (एप्रिल ते सप्टेंबर 2026): या टप्प्यात घरांची स्थिती, वीज, पाणी, स्वच्छता आणि कुटुंबाकडील मालमत्ता यावर लक्ष केंद्रित केले जाईल. आजपासून नागरिकांना ‘स्वयं-नोंदणी’ (Self-Enumeration) करता येईल, तर 16 एप्रिलपासून शासकीय अधिकारी प्रत्यक्ष घराघरात जाऊन माहिती गोळा करतील.
२. दुसरा टप्पा: दुसऱ्या टप्प्यात लोकांची सविस्तर माहिती जसे की वय, शिक्षण, स्थलांतर आणि अत्यंत कळीचा मुद्दा असलेली ‘जातीनिहाय’ माहिती नोंदवली जाईल.
काय विचारले जाणार?
तुमच्या दारात येणारे अधिकारी एकूण 33 प्रश्न विचारणार आहेत. यात घराच्या बांधकामासाठी वापरलेले साहित्य (भिंती, छप्पर, फरशी), पिण्याच्या पाण्याचा स्रोत, शौचालयाची व्यवस्था, इंटरनेट सुविधा, लॅपटॉप, मोबाईल ते अगदी तुमच्याकडे सायकल आहे की कार, अशा सर्व गोष्टींचा समावेश असेल. कुटुंबप्रमुखाचा मोबाईल क्रमांक आणि जातीचा प्रवर्ग (SC, ST, OBC किंवा सामान्य) ही माहिती यंदा अत्यंत महत्त्वाची ठरेल.
या जनगणनेतील सर्वात मोठा आणि चर्चेचा निर्णय म्हणजे ‘लीव्ह-इन रिलेशनशिप’ हा असणार आहे. यंदाच्या नियमांनुसार, जे जोडपे विवाहित नसूनही एकत्र राहतात, त्यांना जनगणनेत ‘विवाहित’ मानले जाणार आहे. दरम्यान, सामाजिक बदल स्वीकारण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. जनगणना झाल्यानंतर नेमकी लोकसंख्या किती याबद्दल अचूक माहिती समोर येणार असून यामुळे अनेक मोठे निर्णय घेण्यास मदत होणार आहे.







