पुणे: राज्यात मान्सून सक्रिय झाला असून, अनेक भागांत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला असून, कोकण किनारपट्टीसह अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा धोका असल्याने सतर्कतेचा सल्ला दिला आहे.
शनिवारी सायंकाळपासून राज्याच्या बहुतांश भागांत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई शहर व उपनगरांमध्ये पुढील ४८ तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांना येलो अलर्ट, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्यानुसार, १८ जूनपर्यंत कोकण किनारपट्टी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तिव्र इशारा देण्यात आला आहे. मुंबई व ठाणे जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सध्या कोकणात पावसाचा जोर अधिक आहे. रायगड जिल्ह्यात माणगाव परिसरात ढगफुटी सदृश पावसामुळे नागावसारख्या भागांमध्ये घरात पाणी साचले आहे. लोणेरे, गुहागर (पालशेत), परशुराम घाट, आणि आडिवरे येथेही मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
मान्सूनच्या गतीत सध्या काहीशी मंदी असली तरी, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही भागांमध्ये पाऊस सुरू आहे. रविवारी रत्नागिरी आणि सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. तर कोकणातील इतर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट आणि मुंबईसाठी येलो अलर्ट लागू आहे.
१५ जून रोजी मुंबईसह संपूर्ण कोकण विभागात दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नवी मुंबई आणि ठाणे भागातही रविवारी गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी व सुरक्षित स्थळी थांबण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.







