लोणी काळभोर, ता. 23 : थेऊर (ता. हवेली) गावातील पवित्र धार्मिक स्थळांच्या परिसरात साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांचा संताप शिगेला पोहोचला असून ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभाराविरोधात आता उघड बंड पुकारण्याची तयारी स्थानिकांकडून सुरू झाली आहे. “रविवारपर्यंत ग्रामपंचायतीने लक्ष घालून स्वच्छता केली नाही, तर हा सगळा कचरा उचलून थेट ग्रामपंचायत कार्यालयात आणून टाकू,” असा थेट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील मोरया गोसावी महाराज तपश्चर्या भूमी, सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसर आणि आसपासच्या भागात नागरिकांकडून बेछूटपणे कचरा टाकला जात असून, या पवित्र स्थळांची अक्षरशः कचरा डेपोमध्ये रूपांतर झाले आहे. धार्मिक भावनांशी संबंधित या ठिकाणांची झालेली ही दयनीय अवस्था पाहून स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे, या भागात कचऱ्याचे ढीग साचून दुर्गंधी पसरली असतानाही ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. उलट, संपूर्ण गावात कचरा गाडी फिरत असताना या भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचेही समोर आले आहे. परिणामी, काही बेजबाबदार नागरिक येथे कचरा टाकण्याचे प्रकार वाढले आहेत.
या परिस्थितीला कंटाळून स्थानिकांनी स्वतः पुढाकार घेत स्वच्छता मोहीम राबवली. पंचायत समिती हवेलीचे सभापती युवराज काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर साफसफाई केली. मात्र, या उपक्रमात ग्रामपंचायतीचा कोणताही सहभाग नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागरिकांनी ग्रामपंचायतीसमोर ठोस मागण्या ठेवल्या आहेत. त्यामध्ये संबंधित ठिकाणी ‘कचरा टाकू नका’ असे फलक लावणे, नियमित कचरा गाडी पाठवणे, कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे आणि संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारणे यांचा समावेश आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत अधिकारी टी. एम. पाटील यांच्याकडे लेखी तक्रार देण्यात आली असून, या प्रकरणाची चौकशी करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.
गावातील पवित्र स्थळांची होत असलेली ही दुर्दशा पाहता नागरिकांमध्ये संताप वाढत असून, ग्रामपंचायत वेळेत जागी झाली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. आता तरी प्रशासन जागे होऊन थेऊरला ‘कचरा मुक्त’ करण्यासाठी कठोर पावले उचलणार का, की नागरिकांना पुन्हा रस्त्यावर उतरावे लागणार, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.






