सासवड, ता. ४ : पुरंदर तालुक्यातील तरटी मळा येथील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या जमिनीच्या वादाने बुधवारी (१ जुलै) हिंसक वळण घेतले. शेतातील पाण्याच्या पाइप काढण्याच्या कारणावरून दोन गट आमनेसामने येत तुंबळ हाणामारी झाली. एका गटाने ट्रॅक्टर अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे, तर दुसऱ्या गटाने लाकडी दांडे, वीट आणि खोऱ्याच्या दांड्याने बेदम मारहाण करून महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली आहे. या घटनेत दोन्ही बाजूंचे अनेक जण जखमी झाले असून सासवड पोलिसांनी एकूण १४ जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरटी मळा येथील गट क्रमांक 97/26 व 97/09 या शेतजमिनीच्या मालकीबाबत न्यायालयात दावा प्रलंबित आहे. या जमिनीच्या ताबा आणि वापरावरून दोन्ही कुटुंबांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. सुधाकर शिवाजी जगताप (वय ६५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १ जुलै रोजी सकाळी पुतण्या कुणाल जगताप याने शेतातील पाण्याच्या पाइप काढले जात असल्याची माहिती दिल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी कृष्णकांत जगताप, लक्ष्मीकांत जगताप व त्यांच्या कुटुंबीयांशी वाद सुरू होता.

वाद वाढल्यानंतर अभिषेक जगताप याने ट्रॅक्टर सुरू करून शेतातील पिकांचे नुकसान केले. पुतण्या कुणाल जगताप याने ट्रॅक्टर थांबविण्याचा प्रयत्न करताच त्याच्या अंगावर ट्रॅक्टर घातल्याचा, तसेच त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या सुधाकर जगताप यांच्या अंगावरही ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या घटनेत सुधाकर जगताप यांच्या उजव्या पायाला दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाले असून त्यांच्यावर सासवड येथील मोरया हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर गंभीर जखमी झालेल्या कुणाल जगताप याला पुढील उपचारासाठी पुण्यातील नोबेल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. तसेच कृष्णकांत, लक्ष्मीकांत, उदय, प्रसाद, धनराज जगताप तसेच मनीषा, जयश्री आणि संध्या जगताप यांनी अभिषेक जगताप याला “त्यांना जिवंत सोडू नका” असे सांगून प्रवृत्त केले व दगडफेक करून मारहाण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
दुसरीकडे, लक्ष्मीकांत चंद्रकांत जगताप (वय ५२) यांनी दिलेल्या फिर्यादीत वेगळाच घटनाक्रम नमूद केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ते पत्नी जयश्री आणि मुलगा अभिषेक यांच्यासह शेतात गवत काढण्यासाठी गेले असता सुभाष, सुधाकर, कुणाल, रणजित जगताप व अन्य नातेवाईकांनी शिवीगाळ करत वाद घालण्यास सुरुवात केली. कुणाल जगताप याने जयश्री जगताप यांची मान पकडून ढकलाढकली केली आणि त्यांचा ब्लाऊज फाडल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
यानंतर दोन्ही गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. सुभाष जगताप यांनी बांबूच्या काठीने संध्या जगताप यांच्या डोक्यात मारहाण केली, तर वीट आणि लाकडी दांड्याने कृष्णकांत, मनीषा तसेच इतरांनाही मारहाण करून जखमी केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या घटनेत दोन्ही बाजूंचे अनेक जण जखमी झाले असून सर्वांनी वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.
दोन्ही कुटुंबांनी संबंधित शेतजमीन ही आपली वडिलोपार्जित मालमत्ता असल्याचा दावा केला असून, त्या संदर्भातील दावा न्यायालयात प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर शेतातील पाण्याच्या पाइप आणि पिकांवरून झालेल्या वादाने हिंसक स्वरूप धारण केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सासवड पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून एकूण १४ जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून, नेमका प्रकार काय घडला याचा सखोल तपास सुरू आहे.






