शिरूर: रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोरेगाव, रांजणगाव परिसर,आठवडे बाजार तसेच प्रवासादरम्यान हरवलेल्या मोबाईलबाबत दाखल झालेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.तांत्रिक विश्लेषण आणि ट्रेसिंगच्या माध्यमातून तब्बल ३ लाख ७५ हजार रुपये किमतीचे १५ हरवलेले मोबाईल शोधून त्यांचे मूळ मालकांना परत करण्यात आले.

नवनियुक्त पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांनी हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवली. विविध तांत्रिक साधनांचा वापर करून मोबाईलचे ट्रेसिंग करण्यात आले.अनेक नागरिक हरवलेला मोबाईल परत मिळण्याची आशाच सोडून देतात.मात्र,रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करत सन २०२५ पासून आजपर्यंत हरवलेल्या मोबाईलपैकी १५ मोबाईलचा यशस्वी शोध लावून नागरिकांचा विश्वास सार्थ ठरविला.

शोधून काढण्यात आलेले सर्व मोबाईल दि.४ जुलै २०२६ रोजी पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या हस्ते संबंधित मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले.अचानक हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानत आनंद व्यक्त केला.अनेकांनी हा अनुभव म्हणजे पोलिसांकडून मिळालेले “सरप्राईज गिफ्ट” असल्याची भावना व्यक्त केली.
या यशस्वी कारवाईस पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल,अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे (खेड विभाग, अतिरिक्त कार्यभार शिरूर उपविभाग)यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमार कदम, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे व पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांनी परिश्रम घेतले.
दरम्यान,हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्याची मोहीम पुढेही सुरू राहणार असून, आणखी मोबाईल शोधून संबंधित नागरिकांना परत देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिली. पोलिसांच्या या नागरिकाभिमुख उपक्रमाचे परिसरातून सर्वत्र स्वागत होत असून, रांजणगाव एमआयडीसी पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.







