मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील रबाळे पोलीस ठाण्याने एक कौतुकास्पद कामगिरी केली आहे. नागरिकांचे गहाळ झालेले तब्बल 183 मोबाईल फोन शोधून ते मूळ मालकांना सुरक्षितपणे परत करण्यात आले आहेत. हस्तगत करण्यात आलेल्या या सर्व फोन्सची एकूण किंमत सुमारे 30 लाख रुपये इतकी आहे. आपला हरवलेला फोन पुन्हा हातात मिळाल्यामुळे नागरिकांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले.

रबाळे पोलिसांनी हा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारच्या CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलची मदत घेतली. या पोर्टलवर तक्रारींची नोंद करून सायबर विश्लेषणाच्या आधारे मोबाईलचा माग काढण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली होती.

या मोहिमेचे नेतृत्व महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका पाटील यांनी केले. तसेच त्यांच्यासोबत या विशेष पथकात महिला पोलीस अंमलदार मेंगडे,पोलीस अंमलदार मंडलिक,पोलीस अंमलदार वायंगणकर,पोलीस अंमलदार करणकाळ या सर्वांनी अहोरात्र परिश्रम घेऊन तांत्रिक तपास केला आणि हे मोबाईल शोधून काढले.
ही यशस्वी मोहीम नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त दीपक साकोरे, पोलीस उपायुक्त विजय खरात आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाली. तसेच पोलीस निरीक्षक (प्रशासन) श्याम बनसोडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सचिन गवळी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाळदे यांनीही या कामात मोलाचे योगदान दिले.
विशेष म्हणजे, रबाळे पोलिसांनी नागरिकांचे फोन शोधण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी अशाच प्रकारे धडक मोहीम राबवून 214 मोबाईल शोधून लोकांच्या स्वाधीन केले होते. त्यानंतर आता पुन्हा 183 मोबाईल परत मिळाल्यामुळे रबाळे पोलिसांच्या तत्परतेचे आणि कार्यक्षमतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.







