पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. ठाणे, पुणे, नाशिक, रायगड आणि पालघर या भागांमध्ये 6 जुलैपर्यंत वादळी वाऱ्यासह अत्यंत तीव्र पाऊस होण्याची शक्यता आहे. यां अनुषंगाने आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”असे आवाहन केले आहे.

राज्यात निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष पूर्णपणे सक्रिय आहेत. सरकारकडून प्रत्येक संवेदनशील भागावर बारीक लक्ष ठेवले जात असून, उद्भवणाऱ्या अडचणी तातडीने सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून मोबाईलवर एसएमएसद्वारे सतत हवामानाचे अपडेट्स पाठवले जात आहेत.

तसेच, खबरदारीचा उपाय म्हणून अतिवृष्टीचा फटका बसलेल्या अनेक भागांमधील शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. संभाव्य अपघात टाळण्यासाठी शासकीय सूचनांचे तंतोतंत पालन करावे आणि हवामानाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.नागरिकांनी अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय प्रवास करणे टाळावे आणि सुरक्षित राहावे.
मुंबईसह संपूर्ण उपनगरांमध्ये गेल्या 4 दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. हवामान विभागाने मुंबई आणि आसपासच्या क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ दिला आहे.
गेल्या 24 तासांत विविध भागांत 100 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 4 ते 7 जुलै दरम्यान पालघर, ठाणे, रायगड, पुणे घाटमाथा आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये 200 ते 250 मिमीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.







