महाराष्ट्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीवर मोठं विधान केलं आहे. राज्य सरकारची भूमिका शेतकरी कर्जमाफीवर स्पष्ट आहे. ‘सरकार शब्द फिरवणार नाही. योग्यवेळी कर्जमाफीचा निर्णय होईल.’ असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. ते आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलत होते.

राज्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा तापला असताना मुख्यमंत्र्यांचं हे विधान शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे. ‘सरकार आपले शब्द फिरवणार नाही. कर्जमाफी कधी करायची? या संदर्भात काही नियम आहेत, पद्धती आहे.’ असं फडणवीस यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान, शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय घेण्यासाठी १५ दिवसांच्या आत समिती नेमली जाईल. त्यानंतर या समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफीबाबत निर्णय घेतला जाईल. असं आश्वासन प्रहारचे संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना सरकरांकडून एक आठवड्यापूर्वी देण्यात आले होते. त्यांनंतर आता फडणवीसांनी कर्जमाफीवर हे विधान केलं आहे. यावरून लवकरच शेतकरी कर्जमाफीवर निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. हे आश्वासनाबाबत महायुतीच्या जाहीरनाम्यातही लिहिण्यात आले होते. पण आता या सरकारला सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होत अलेला असतानाही अद्याप शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता फडणवीसांच्या या वक्तव्यावरून कर्जमाफी होणार हे नक्की, पण त्यासाठी काय नियम असतील हे येणार काळच सांगेल.








