अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : शिरुर तालुक्यातील वढु बुद्रुक सह तुळापुर येथे मी मुख्यमंत्री असताना चारशे कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केलेला होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा विकास होऊन छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक हे एक तीर्थक्षेत्र होईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
वढू बुद्रुक ता. शिरुर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या 336 व्या पुण्यतिथी निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी आमदार माऊली कटके, भोसरीचे आमदार महेश लांडगे, श्री क्षेत्र सरला बेटचे महंत रामगिरी महाराज, माजी खासदार म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोरे, धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीचे कार्यवाहक मिलिंद एकबोटे, शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख श्री बापूसाहेब शिंदे व वढू बुद्रुक गावचे सरपंच यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान यावेळी बोलताना आज छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन असून हजारो शंभू भक्त या ठिकाणी माथा टेकवायला आणि अभिवादन करायला येतात. मी देखील विनम्र अभिवादन करायला आलो आहे. छत्रपती संभाजी महाराज हे शौर्याचे प्रतीक असून त्यांचे येथे असलेले स्मारक हे तीर्थक्षेत्र होईल आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याला साजेशे असे वढू आणि तुळापूर येथे तीर्थक्षेत्र होईल. त्यामुळे देशभरातून लाखो लोक येथे येऊन प्रेरणा व ऊर्जा घेऊन जातील. स्मारकासाठी जे काही लागेल त्यासाठी आम्ही कोठेही मागे पडणार नसल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.