पुणे: येणाऱ्या काही महिन्यांत (Eknath Shinde) होऊ घातलेल्या पुणे महापालिका निवडणुकीत (Local Bodies Election) मोठमोठ्या नेत्यांची (Tanhaji Sawant) प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः आपल्या पक्षाचा झेंडा पुणे महापालिकेवर फडकवण्यासाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक केवळ महापालिकेपुरती मर्यादित न राहता राज्याच्या राजकीय समीकरणांवर परिणाम करणारी ठरणार आहे.

मात्र, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पुण्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी आपल्या मुलाने पुणे महापालिका निवडणूक लढवावी अशी सुप्त इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे धाराशिवचे सावंत आता पुण्याच्या राजकारणात झळकणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

आज पुण्यात झालेल्या एका आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमात तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत यांनी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले. त्यानंतर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तानाजी सावंत म्हणाले, “हे आता काळ ठरवेल, हे आम्ही नाही तर जनता ठरवणार आहे. समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, तो वारसा जपण्याचा आमचा प्रयत्न आहे. धाराशिवच्या राजकारणातील वजन इथे प्रतिबिंबित होईल की नाही हे कोणताही नेता ठरवत नाही, ते जनता ठरवते.”
यावेळी सावंतांना विचारले गेले की, एक पिता म्हणून आपल्या मुलाने महापालिका निवडणूक लढवावी अशी अपेक्षा आहे का? त्यावर त्यांनी उत्तर दिले, “एक पिता म्हणून माझी अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा पूर्ण होईल असे वाटते. माझ्या जीवनात नगरसेवक असा टप्पा आला नाही. परमेश्वराच्या कृपेने थेट आमदार झालो आणि त्यानंतर थेट मंत्री झालो. 8 वर्षांच्या राजकीय कार्यकाळात मी 4 वर्षे मंत्री होतो आणि तेही कॅबिनेट मंत्री. त्यामुळे महाराष्ट्राला दिलेल्या योगदानानंतर आता माझा मुलगा पुण्याच्या राजकारणात काम करेल अशी अपेक्षा आहे.”
या वक्तव्यामुळे पुण्यातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, स्थानिक शिवसेना नेत्यांकडून सावंतांच्या मुलाला हिरवा कंदील मिळेल का, तसेच स्थानिक पातळीवर त्यांच्या उमेदवारीला कितपत स्वीकार मिळणार, यावरून नव्या संघर्षाची शक्यता व्यक्त केली जात आहे.







