उरुळी कांचन, (पुणे) : मनुष्याने सकारात्मक विचारांचे मनन केल्यास त्यांच्याही आयुष्यात संत सावतामाळी प्रमाणे उत्तम बाग फुलवली जाऊ शकते. आजही अनेक शतकांनंतर संत महात्म्यांचे विचार आपल्या सर्वसामान्यांच्या जीवनात लागू होतात. परंतु या संत किंवा राष्ट्रपुरुषांना काही नाठाळांनी जातीपातीत विभागून टाकल्याची खंत प्रमुख व्याख्याते ज्येष्ठ इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत यांनी व्यक्त केली.
उरुळी कांचन, (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कस्तुरी लॉन्स येथे संत शिरोमणी श्री सावतामाळी महाराज यांची ७२८ वी पुण्यतिथी व “कार्यगौरव सत्यशोधक परिवर्तन पुरस्कार सोहळा २०२२” याचे वितरण बुधवारी (ता. २७) अखिल माळी समाज संघ उरुळी कांचनच्या वतीने करण्यात आले यावेळी लडकत बोलत होते.
यावेळी या कार्यक्रमास शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे, पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर, उरुळी कांचनचे सरपंच राजेंद्र कांचन, अर्जुन कांचन, लक्ष्मण जगताप, संजय टिळेकर, मिलिंद जगताप, समता परिषद अध्यक्ष गणेश टिळेकर, किरण झगडे, राजेंद्र टिळेकर, बाळासाहेब चौरे, विजय टिळेकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन अखिल माळी समाज संघाचे अध्यक्ष संजय रायकर, प्रशांत लोंढे, निखिल लोंढे, भानुदास जगताप, अनिल लोंढे, निखिल जगताप, धनाजी जगताप, रवी आगरकर, कानिफनाथ लोंढे, बाळासाहेब ताम्हणे व भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र व्यापार आघाडीचे विकास जगताप यांनी प्रामुख्याने केले होते.
यावेळी अखिल माळी समाज संघाच्या वतीने यावर्षी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले कार्यगौरव पुरस्कार ड्रीम्स फाउंडेशन संचलित उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुप, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कार्यगौरव पुरस्कार आशासेविका (प्राथमिक आरोग्य केंद्र), व सत्यशोधक परिवर्तन पुरस्कार २०२२ कस्तुरी प्रतिष्ठान यांना प्रामुख्याने गेल्या दोन वर्षातील त्यांनी केलेल्या समाजाभिमुख कार्याची नोंद घेऊन पुरस्कार्थीना गौरवण्यात आले.
दरम्यान, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी कृषी अधिकारी सुनील लांडगे म्हणाले, “जीवनातील पाप कमी करण्यासाठी रोज जप करणे महत्त्वाचे आहे.” ज्येष्ठ लेखक कादंबरीकार लक्ष्मण सूर्यभान घुगे व गुरुदत्त भजनी मंडळ यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम काकडे यांनी केले तर आभार गोविंद शिवरकर यांनी मानले.