बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा विवाह लवकरच फलटणच्या ऋतुजा पाटील यांच्याशी होणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या विवाहाची माहिती समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली. या विवाहाच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनंतर पवार घराणे पुन्हा एकत्र येणार आहे. ऋतुजा या फलटण येथील प्रवीण पाटील यांच्या कन्या आहेत. प्रवीण पाटील हे सोशल मीडिया कंपनी सांभाळतात. ऋतुजा या उच्चशिक्षित असून, जय आणि ऋतुजा या दोघांमध्ये मागील काही वर्षांपासन ओळख होती. जय पवार यांनी पार पडलेल्या विधानसभेला बारामती मतदारसंघातील प्रचाराची धुरा सांभाळली होती. गावोगावी दौरे करत त्यांनी वडिलांचा प्रचार केला होता. जय पवार यांनी दुबईत काही काळ व्यवसाय सांभाळल्यानंतर ते राजकारणात सक्रिय झाले.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्षाच्या बैठकीला, प्रचाराला त्यांनी हजेरी लावली होती. बारामतीतल्या युवक मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, त्यामुळे पार्थ यांच्यापाठोपाठ जय यांनी राजकारणात आपली छाप पाडली. राष्ट्रवादीतील फुटीनंतर अनेकदा पवार घराण्यातील वाद जाहीररीत्या समोर आला होता. राज्यात राजकीय घडामोडी घडत असतानाच पवार बंधूचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू होते. तसेच कार्यक्रमांमध्ये व्यासपीठावर समोरासमोर येणे देखील टाळले जात होते, परंतु जय यांच्या विवाहाच्या निमित्ताने का असेना पवार घराणे एकत्र येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.