पुणे : पुण्यातील रिक्षा अपघात प्रकरणामुळे लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) चांगलीच चर्चेत आली आहे. ३० सप्टेंबर रोजी पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ तिच्या नावावर असलेल्या कारने एका रिक्षाला जोरदार धडक दिली होती. या धडकेत रिक्षाचालकासह दोन प्रवासी जखमी झाले असून रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे हे गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातानंतर रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेत न्यायाची मागणी केली. तसेच गौतमी पाटीलला अटक करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. एवढा मोठा अपघात झाला असतानाही गौतमी पाटील हिच्या टीमकडून कोणतीही चौकशी करण्यात आली नसून, साधा एक मेसेजही आला नसल्याचा आरोप रिक्षा चालकाच्या कुटुंबीयांनी केला.
यानंतर चंद्रकांतदादा यांनी तातडीने डीसीपी संभाजी पाटील यांना फोन करत गौतम पाटीलला उचलायचं की नाही? असा थेट सवाल करत याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, पुणे पोलिसांनी आता गौतमी पाटीलला क्लीन चीट दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, ज्यावेळी अपघात घडला त्यावेळी गौतमी पाटील या त्या कारमध्ये नव्हत्या आणि यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊ शकत. अपघात प्रकरणी सर्व सीसीटीव्ही तपासले असून, अपघात प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही आणि अन्य चौकशीमध्ये गौतमी पाटील कारमध्ये नव्हती असे समोर आले असून, तिला या प्रकरणी क्लीन चिट देण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
गेल्या महिन्यात (30 सप्टेंबर) वडगाव पुलाजवळ गौतमी पाटीलच्या वाहनाने एका रिक्षाला मागून जोरदार धडक दिली होती. या अपघातात मरगळे नावाचे रिक्षाचालक गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सध्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातावेळी गौतमी ही कारमध्ये उपस्थित नव्हती. मात्र, अपघाताततील कार तिच्या नावाने असल्याने नृत्यांगणा चर्चेत आली आहे.







