Ambedkar jayanti लोणी काळभोर, ता. 29 : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील पालखीतळ परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वृक्षारोपण, तसेच शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करून जयंती उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरी करण्यात आली. राष्ट्रीय मांग गारुडी क्रांती सेना, लहुजी शक्ती सेना आणि भगवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. जयंतीच्या निमित्ताने वृक्षारोपण करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला, तर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून शिक्षणाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला. Ambedkar jayanti

कार्यक्रमात बोलताना तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अभिजीत रामदास बडदे यांनी बाबासाहेबांच्या विचारांवर प्रकाश टाकला. “शिक्षण हे केवळ साक्षरता नसून अन्यायाविरुद्ध लढण्याचे प्रभावी शस्त्र आहे. ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा त्यांचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे,” असे त्यांनी सांगितले. तसेच, शिक्षणातून स्वाभिमान आणि आत्मसन्मान निर्माण होतो, या विचारांची अंमलबजावणी करण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाचे आयोजन अभिजीत बडदे, विजय विठ्ठल सकट (अध्यक्ष, पुणे जिल्हा लहुजी शक्ती सेना) आणि विजय आप्पासाहेब बोडके (अध्यक्ष, राष्ट्रीय मांग गारुडी क्रांती सेना) यांनी केले होते. Ambedkar jayanti
यावेळी माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड, गौरी गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य अविनाश बडदे, आकाश काळभोर, सिमिंता लोंढे, अशोक शिंदे, सुहास काळभोर, सतीश काळभोर, ज्ञानेश्वर नामूगडे, दीपक काळभोर, नितीन लोखंडे, तुषार काळभोर, पृथ्वीराज काळभोर, बापूराजे गायकवाड, रोहन सपकाळ, सागर गायकवाड, अभिजीत पाचकुडवे, सिद्धेश कायगुडे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमांमुळे जयंती केवळ औपचारिक न राहता समाजजागृती आणि शिक्षण प्रसाराचा प्रभावी संदेश देणारी ठरली. Ambedkar jayanti






