पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कंबर कसली असून, आपल्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) अधिक मजबूत करण्याची तयारी सुरू केली आहे. यानिमित्ताने ते पक्षाच्या अनेक कार्यक्रमांना देखील उपस्थितीत दर्शवत आहेत. नुकतीच त्यांनी पुण्यात पार पडलेल्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला हजेरी लावत आपल्या काकांची म्हणजेच शरद पवार यांची आठवण काढली आहे. नेमकं अजित पवार काय म्हणाले? पाहूया…
पुण्यातील शिवाजीनगर येथील पक्ष कार्यालयात नुकताच पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला असून, या कार्यक्रमाला देखील अजित पवार उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत भाजपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, शरद पवार यांच्या गटातील राष्ट्रवादीचे मुरलीधर निंबाळकर आणि मारुती किंडरे, तसेच काँग्रेसचे रोहन सुरवशे यांच्यासह अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला आहे.

यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधला. उपस्थितांना मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी आपल्या भाषणात शरद पवारांचा उल्लेख केला. ते म्हणाले, “आजचा अजित पवार आणि आधीचा अजित पवार यात खूप फरक आहे. वयानुसार माणसांमध्ये मॅच्युरिटी येते. पूर्वी आपल्या हातून काही चूक झाली तर त्यावर पांघरुण घालायला ‘साहेब’ होते, पण आता मात्र, आपल्यालाच आपल्या चुकांवर पांघरुण घालावे लागते.” असं म्हणताच त्यांच्या या वक्तव्यावर सभागृहात एकच हशा पिकला.
दरम्यान, अलीकडेच अजित पवार यांच्या काही वक्तव्यांवरून वाद निर्माण झाले होते. यानंतर त्यांना त्याबाबत स्पष्टीकरण देखील द्यावे लागले होते. यामध्ये आयपीएस अधिकाऱ्याला केलेला फोन कॉल असो किंवा मग पूरग्रस्त भागाचा दौरा करत असताना ‘पैशाचे सोंग घेता येत नाही’ हे वक्तव्य असो. त्यानंतर अजित पवारांनी केलेलं हे वक्तव्य आता राजकीय वर्तुळात चांगलंच चर्चेत आहे.







