कोपरगाव: अविवाहित तरुणांना (Ahilyanagar Crime) लग्नाचं आमिष दाखवून (Ahilyanagar News) लाखो रुपये उकळणाऱ्या हाय-प्रोफाइल टोळीचा कोपरगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कोपरगाव तालुक्यातील माहेगाव येथील एका तरुणाला जालना येथील रोशनी अशोक पवार नावाच्या ‘बनावट नवरी’सह लग्न लावून देऊन सव्वा दोन लाख रुपये घेतल्याची घटना उघडकीस आली. मात्र, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरी घरातून पळ काढल्याने तरुणाला फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

पोलीस तपासानुसार माहेगाव येथील तरुणाला लग्नासाठी मध्यस्थांमार्फत ही तरुणी दाखवण्यात आली. आठ ते अकरा ऑक्टोबर दरम्यान चर्चा आणि लग्न पार पडले, त्यावेळी मध्यस्थांनी सव्वा दोन लाख रुपये घेतले. परंतु लग्नाच्या पहिल्या रात्री पहाटे नवरी पसार झाली. सकाळी तरुण आणि त्याच्या कुटुंबीयांनी मध्यस्थांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर तरुणाने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.

याप्रकरणी ‘बनावट नवरी’सह पाच आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुख्य आरोपी महिलेला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी केलेल्या तपासातून टोळीची योजना स्पष्ट झाली असून, हे प्रकार अविवाहित तरुणांना आर्थिक फसवणुकीसाठी विशेष लक्ष देत होते, असे समोर आले.

कोपरगाव पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पोलीस निरीक्षक संदीप कोळी म्हणाले, “अविवाहित तरुणांनो, लग्नाचं आमिष दाखवून होणाऱ्या फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करा. मागील काही वर्षांपासून अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. केवळ पैसे उकळण्यासाठी काही टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. अशा प्रकारच्या घटना समाजासाठी अत्यंत चिंताजनक आहेत आणि यावर वेळीच कठोर उपाययोजना करणं गरजेचं आहे.”
पोलीस प्रशासन या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, बाकीच्या आरोपींचा शोध घेण्यासाठी कारवाई सुरू आहे. तसेच, अविवाहित तरुणांना अशा फसवणूक करणार्या टोळ्यांकडून सावध राहण्याची सल्ला दिला जात आहे.







