मुंबई: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशोक खरात प्रकरणाबाबत गंभीर आरोप करत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, अभिजीत भांडे पाटील हे सध्या अशोक खरातला मदत करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक सक्रिय आहेत. अनेक राजकारणी, पोलीस अधिकारी आणि सरकारी अधिकारी अशोक खरातशी सतत संपर्कात होते, असेही त्यांनी नमूद केले.
दमानिया यांच्या मते, रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणात आपला संबंध नसल्याचे सांगितले असले तरी त्यांनी खरातला तब्बल 177 वेळा फोन केले होते. एका कॉलवर त्यांनी सुमारे 22 मिनिटे संवाद साधल्याचा दावा करण्यात आला. मात्र, अभिजीत भांडे पाटील यांनी दोन वेगवेगळ्या मोबाईलवरून एकूण 196 वेळा खरातशी संपर्क साधल्याचेही त्यांनी सांगितले.

दमानिया यांनी पुढे म्हटले की, अभिजीत भांडे पाटील हे मुंबईत डेप्युटी कलेक्टर म्हणून कार्यरत होते आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात काम करत होते. त्यांनी खरातला वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच खरातची पत्नी कल्पना, मुलगी तृप्ती आणि कुटुंबातील इतर सदस्य सध्या फरार असून त्यांना कोणीतरी संरक्षण देत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे या सर्वांना एसआयटीने ताब्यात घेऊन चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
रुपाली चाकणकर यांनी मात्र आपल्यावरचे आरोप फेटाळले असून आपण कोणतीही चूक केलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही महिला आयोगाकडून नोटीस देऊन तत्काळ सुनावणी घेण्यात आली, यावरही दमानिया यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा तपास नाशिक, अहमदनगर आणि इतर संबंधित यंत्रणांकडून सुरू असून पुढील तपासावर सर्वांचे लक्ष लागले आहे.







