मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून सोडणारे आणखी एक जमीन खरेदीचे नवीन (Land Scam) प्रकरण समोर आले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार विजय वडेट्टीवार यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार विजय वडेट्टीवार यांनी सांगितले कि, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा-भाईंदर भागातील सरकारी मालकीची जमीन बाजारपेठेतील किंमत सुमारे 200 कोटी रुपये असताना, ती केवळ 3 कोटी रुपयांना विकत घेतली आहे. वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.

या नवीन दाव्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचा मुलगा पार्थ पवार हे जमीन गैरव्यवहारामुळे चर्चेत असतांना नवीन घोटाळा समोर आला कि काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपानंतर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून यासंदर्भात त्यांनी वडेट्टीवार यांना पुरावे सादर करण्याची मागणी केली आहे.
जमिनीच्या व्यवहाराबद्दल सरनाईक यांनी सांगितले कि, जमीन 8025 चौरस मीटर इतकी असून ती सूनबाईंच्या ‘सिद्ध्येश चॅरिटेबल ट्रस्ट’ने शैक्षणिक संस्था सुरु करण्यासाठी घेतली आहे. तसेच सर्व शासकीय नियम आणि प्रक्रिया पूर्ण करूनच हा व्यवहार करण्यात आला आणि जमिनीचा ताबा घेण्यासाठी 4 कोटी 55 लाख रुपये इतकी रक्कम भरण्यात आली आहे. वडेट्टीवार यांनी तथ्यांची तपासणी न करता असे निराधार आरोप केले आहेत. असे सरनाईक यांनी सांगितले आहे.
एकंदरीत, राज्याच्या राजकारणात एकापाठोपाठ एक जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार चव्हाट्यावर येत असताना, वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपानंतर येत्या काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. या जमीन व्यवहाराची सत्यता आणि त्यामागील वास्तव काय आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.







