Election : राज्यात महापालिका निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे. निवडणूक आयोगानं कार्यक्रम जाहीर केल्यानंतर सगळे पक्ष जोरात मैदानात उतरले आहेत. येत्या 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल लागणार आहे. 30 डिसेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानं आता कोण कुणाविरुद्ध लढणार, कोणाला कुठल्या पक्षाकडून तिकीट मिळालंय, हे चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. (Election)

अशातच अहिल्यानगरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत उभे असलेले मनसेचे दोन उमेदवार अचानक गायब झाले आहेत. गेल्या २४ तासांपासून त्यांचा कुटुंबीयांशीही संपर्क नाही, अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि सुमित वर्मा यांनी दिली आहे.
केडगाव परिसर संवेदनशील असल्यामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठीच हे अपहरण झालं असावं, असा संशय विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी व्यक्त केला आहे. प्रभाग क्रमांक १७ मधील राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग अशी या गायब उमेदवारांची नावं आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांपैकी एक उमेदवार भाजपच्या, तर दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवाराविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात होता. या प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, गायब उमेदवारांचा तात्काळ शोध घ्यावा अशी मागणी केली आहे.
दरम्यान, या सगळ्या घडामोडींमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युतीही चर्चेचा विषय ठरतेय. तब्बल १८ वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत ही युती महायुतीसाठी मोठं आव्हान ठरू शकते, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.







