Crime News : राज्यात महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच सोलापूरमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. अर्ज माघारी घेण्याच्या गडबडीत राजकीय वाद चिघळला आणि त्यातून एका तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. मृत तरुण हा मनसेचा पदाधिकारी असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे सोलापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना सोलापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २ मध्ये घडली. बाळासाहेब सरवदे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. ते मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी होते. राजकीय वादातूनच त्यांची हत्या झाल्याचा आरोप केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग २ मध्ये आज अर्ज माघारी घेण्यावरून भाजपच्या दोन गटांत जोरदार वाद झाला होता. या प्रभागातून शालन शिंदे हे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात भाजपच्याच बंडखोर रेखा सरवदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
रेखा सरवदे यांनी अर्ज मागे घ्यावा, यासाठी दबाव टाकला जात होता. याच मुद्द्यावरून शिंदे गट आणि सरवदे गटात वाद इतका वाढला की भाजप नेते शंकर शिंदे यांचं कार्यालयही फोडण्यात आलं.
याच वादात मध्यस्थी करण्यासाठी बाळासाहेब सरवदे तिथे गेले होते, असं सांगितलं जातं. मात्र त्या वेळी शिंदे गटातील लोकांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला, असा आरोप सरवदे यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते.
जखमी अवस्थेत त्यांना तातडीने सोलापूरच्या सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. ही बातमी कळताच रुग्णालय परिसरात नातेवाईक आणि मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली.
दरम्यान, या प्रभागातून भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र किरण देशमुख देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. संपूर्ण पॅनल बिनविरोध व्हावा, यासाठी भाजपकडून मोठा दबाव टाकला जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळेच सरवदे कुटुंबावरही दबाव होता, असं म्हटलं जात आहे.
समाजात वाद वाढू नये म्हणूनच बाळासाहेब सरवदे मध्यस्थी करण्यासाठी गेले होते. मात्र त्याच वेळी शिंदे गटाच्या लोकांनी त्यांची हत्या केली, असा गंभीर आरोप मनसेचे पदाधिकारी प्रशांत इंगळे यांनी केला आहे.
या घटनेमुळे सोलापूरच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. (crime news)







