मुंबई: राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून पुन्हा एकदा राजकीय वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी योजनेतील लाभार्थी महिलांच्या संख्येबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत सरकारकडे पारदर्शक स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, योजनेच्या सुरुवातीला राज्य सरकारने 2.37 कोटी महिलांना लाभ दिल्याचा दावा केला होता. डिसेंबर 2024 पर्यंत या महिलांना 17 हजार 505 कोटी रुपयांहून अधिक निधी वितरित करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली होती. पुढे लाभार्थ्यांची संख्या 2.46 ते 2.48 कोटींपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात आले होते.
मात्र, ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक झाल्यानंतर लाभार्थींची संख्या कमी होत गेली. सध्या सुमारे 1.66 कोटी महिलांनाच योजनेचा लाभ मिळत असल्याचे समोर येत असून, तब्बल 80 लाख महिलांना अपात्र ठरविण्यात आल्याची माहिती माध्यमांतून समोर येत असल्याचे सुळे यांनी नमूद केले.
याशिवाय, योजनेच्या पोर्टलवरील आकडेवारीनुसार एकूण अर्जांची संख्या 1.12 कोटी आणि मंजूर अर्जांची संख्या 1.06 कोटी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीच्या तुलनेत 1.25 कोटींहून अधिक महिलांना योजनेतून वगळण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
सरकारने सुरुवातीला जाहीर केलेले लाभार्थी कोण होते, पडताळणीत इतक्या मोठ्या प्रमाणात महिला अपात्र का ठरल्या आणि सध्याची नेमकी लाभार्थी संख्या किती आहे, याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी सुळे यांनी केली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी, आर्थिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षण करण्यात यावे, तसेच कोणतीही पात्र महिला केवळ तांत्रिक कारणांमुळे योजनेपासून वंचित राहू नये, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.






