मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांत वाढलेल्या भेटीगाठींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाल्यानंतर आता सुप्रिया सुळे आपल्या पक्षातील 8 खासदारांसह मोदींची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही आठवड्यांत सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली आहे. त्यामुळे शरद पवार गट NDA मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना पुन्हा जोर आला आहे. राजकीय वर्तुळात या भेटींकडे आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने पाहिले जात आहे.

मात्र, सुप्रिया सुळे यांनी या भेटींबाबत वेगळी भूमिका मांडली आहे. कोणतीही चर्चा लपूनछपून होत नसून, पंतप्रधानांसोबतची भेट सार्वजनिकपणे होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, पाणीटंचाई, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ही भेट असल्याचे सुळे यांनी सांगितले.

दरम्यान, राजकीय चर्चांमध्ये मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाचा मुद्दाही पुढे आला आहे. या विषयांवर केंद्र सरकारची रणनीती आणि त्यासंदर्भातील भूमिका याबाबतही चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सुळे यांची मोदींसोबत होणारी भेट महाराष्ट्राच्या राजकारणात नेमके कोणते संकेत देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







