पुणे: राज्यसभा निवडणूक प्रक्रिया सध्या वेगवान (Rajya Sabha Election) झाली आहे. 10 राज्यांमधील 37 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत भाजपने आपली पहिली खेळी खेळत 9 उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र, सर्वांचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्रातील 7 जागांबाबत अद्याप ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेण्यात आली आहे.
भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत बिहार, आसाम, छत्तीसगड आणि ओडिसासारख्या महत्त्वाच्या राज्यांचा समावेश आहे. यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भाजपने आपले राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीन यांना बिहारमधून उमेदवारी जाहीर केली आहे. नितीन नवीन हे बिहारमधील तरुण आणि अभ्यासू चेहरा म्हणून ओळखले जातात. त्यांच्या माध्यमातून भाजपने नव्या पिढीला नेतृत्व देण्याचा संकेत दिला आहे.

भाजपचे प्रमुख उमेदवार:
-
बिहार: नितीन नवीन, शिवेश कुमार
-
ओडिसा: मनमोहन सामल, सुजीत कुमार
-
हरियाणा: संजय भाटिया
-
पश्चिम बंगाल: राहुल सिन्हा
महाराष्ट्रातून राज्यसभेवर 7 खासदार पाठवले जाणार आहेत. विधानसभेतील सध्याचं संख्याबळ पाहता, भाजपला 3 जागा सहज जिंकता येतील. मात्र, चौथ्या जागेसाठी मित्रापाक्षाची मदत घ्यावी लागेल.
विनोद तावडे, रावसाहेब दानवे, विजया रहाटकर आणि माधव भंडारी यांसारख्या अनुभवी नेत्यांसोबतच केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि डॉ. भागवत कराड यांना पुन्हा संधी मिळते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. 5 मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने पुढील 48 तास महाराष्ट्र भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.







