नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून 2026 साठीच्या पद्म पुरस्कारांची (Padma Awards 2026) घोषणा करण्यात आली असून, महाराष्ट्रासाठी ही घोषणा विशेष अभिमानाची ठरली आहे. देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक मानल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांमध्ये यंदा महाराष्ट्रातील 4 मान्यवरांचा समावेश झाला आहे. लोककला, कृषी आणि आदिवासी संस्कृती जपणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेत केंद्राने हा सन्मान जाहीर केला आहे. (Latest Marathi News)
लोकनाट्य आणि तमाशा या पारंपरिक कला प्रकाराला आयुष्यभर वाहून घेतलेले कलाकार रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. ग्रामीण आणि लोककलेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी सातत्याने केलेल्या कामाची ही राष्ट्रीय पातळीवरील पावती मानली जात आहे. तमाशा परंपरेतील कुटुंबातून आलेले रघुवीर खेडकर यांनी लोकनाट्य जपण्याबरोबरच ते नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. याआधी त्यांच्या मातोश्री विठाबाई नारायणगावकर यांना 2005 मध्ये महाराष्ट्र शासनाचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता.

कृषी क्षेत्रातील योगदानासाठी श्रीरंग देवबा लाड यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या जीवनाशी जोडलेले प्रयोग, नवकल्पना आणि दीर्घकालीन कामगिरीमुळे त्यांची निवड झाली आहे. ग्रामीण भागातील शेती अधिक सक्षम करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न केंद्राच्या नजरेत आले आहेत.
पालघर जिल्ह्यातील वारली आदिवासी संगीत परंपरा जपणारे भिकल्या लाडक्या ढिंका आणि सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या आर्मिदा फर्नांडीस यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. आदिवासी संस्कृती, लोकसंगीत आणि सामाजिक बांधिलकी यांना राष्ट्रीय स्तरावर मिळालेली ही मान्यता आहे.
यंदा देशभरातून 45 मान्यवरांची पद्म पुरस्कारांसाठी निवड झाली असून, त्यात महाराष्ट्रातील 4 भूमिपुत्रांचा समावेश हा राज्यासाठी गौरवाचा क्षण मानला जात आहे. परंपरा, शेती आणि समाजकार्य यांसारख्या क्षेत्रांतील निःस्वार्थ योगदानाला मिळालेली ही दखल पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.







