पुणे: काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या डिजिटल कारवायांवरून केंद्र सरकारवर अतिशय गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे. या पक्षाची सोशल मीडिया अकाऊंट्स अचानक ब्लॉक आणि हॅक होण्यामागे केंद्रीय गुप्तचर यंत्रणा म्हणजेच ‘आयबी’ (IB) चा थेट हात असल्याचा दावा पटोले यांनी केला. देशातील जनतेमध्ये सध्या केंद्र सरकारविरोधात तीव्र संताप असून, हा जनक्षोभ वेळीच दडपण्यासाठीच ही दडपशाही सुरू असल्याचे ते म्हणाले.
नाना पटोले यांच्या दाव्यानुसार, देशातील जनतेमध्ये सध्या केंद्र सरकारविरोधात तीव्र संतापाचे वातावरण असून, त्याची माहिती ‘आयबी’ने (IB) एका गुप्त अहवालाद्वारे थेट पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचवली होती.
जर हा लोकांचा राग वेळीच दाबला नाही, तर सरकार समोरील अडचणी वाढू शकतात, असे या अहवालात नमूद करण्यात आले होते. याच माहितीमुळे धास्तावलेल्या मोदी सरकारने घाईघाईने ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे सोशल मीडिया अकाऊंट हॅक आणि बंद करण्याचे पाऊल उचलले, असा खळबळजनक आरोप पटोले यांनी केला आहे.
मात्र, अशा प्रकारच्या डिजिटल बंदीने किंवा दडपशाहीने सामान्य जनतेचा आवाज रोखणे सरकारला कधीही शक्य होणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.







