मुंबई: राज्याच्या विधानसभेत सध्या एका वेगळ्याच मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. इस्लाम धर्मातील बहुपत्नीत्वाच्या प्रथेवरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आमदारांमध्ये जोरदार वाद झाला आहे. या चर्चेची सुरुवात भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी केली. त्यांनी बहुपत्नीत्वाच्या प्रथेमुळे मुस्लीम महिलांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला. तसेच, राज्यात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याबाबत सरकार कोणती भूमिका घेणार आणि त्यासाठी टास्क फोर्स नेमणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

या आरोपांना राष्ट्रवादीच्या आमदार सना मलिक यांनी अत्यंत आक्रमक भाषेत उत्तर दिले. केवळ मुस्लीम महिलांवरच अन्याय होतो, हे विधान चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. मलिक यांच्या मते, बहुपत्नीत्वाच्या प्रथा केवळ मुस्लीम धर्मातच नाहीत, तर इतर अनेक समाजातही अशा प्रथांचे अस्तित्व आहे. धर्माच्या नावाखाली चुकीच्या प्रथांना समर्थन देण्यापेक्षा त्या समजून घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘तिहेरी तलाक’बद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, इस्लाममध्ये ज्या गोष्टी मान्य नव्हत्या, त्या रद्द झाल्यावर आम्ही स्वतः त्याचे स्वागत केले असते, कारण धर्माचा चुकीचा वापर होणे आम्हालाही मान्य नाही.

सना मलिक यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर सभागृहात प्रचंड गोंधळ निर्माण झाला. पाकिस्तानने नवीन केलं नाही, कुराणमध्ये जे सांगितलं आहे, त्याची अंमलबजावणी केली . भारतामध्येही कुराणची अंमलबजावणी करावी, हिच आमची मागणी आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी त्यांच्या विधानाला तीव्र विरोध केला. भाजपचे अतुल भातखळकर यांनी यावर जोरदार टीका करत, “हा देश संविधानानुसार चालतो, कुराणावरून नाही,” असे विधान केले. यामुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण होते.
या संपूर्ण प्रकारामुळे सत्ताधारी महायुतीतील मतभेद उघड झाले आहेत. सना मलिक यांच्या समर्थनार्थ अजित पवार गटाचे इतर नेते उभे राहिल्याने युतीमध्ये दोन स्पष्ट गट पडल्याचे दिसून आले. धार्मिक प्रथा, संविधान आणि राजकीय मतभेद यांमुळे सुरू झालेला हा वाद आगामी काळात अधिक चिघळण्याची शक्यता आहे. या चर्चेने विधानसभेत एकच खळबळ उडवून दिली असून, राजकीय वर्तुळात यावरून उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.







