मुंबई: मुंबईसह महाराष्ट्रातील रस्त्यांवर धावणाऱ्या ‘ओला’, ‘उबर’ आणि ‘रॅपिडो’ सारख्या अॅप-आधारित पेट्रोल बाईक टॅक्सींवर आता अधिकृतपणे बंदी घालण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत ही मोठी घोषणा केली. राज्य सरकारने केवळ पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या ‘इलेक्ट्रिक’ बाईक टॅक्सींना परवानगी दिली असताना, कंपन्यांनी पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांना परवानगी दिल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे.

राज्यात सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रदुषण कमी करण्यासाठी सरकारने इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी धोरण आखले होते. मात्र, रॅपिडो आणि ओला-उबरसारख्या बड्या कंपन्यांनी या धोरणाचा गैरफायदा घेतला. इलेक्ट्रिक वाहनांच्या नावाखाली हजारो पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकी टॅक्सी म्हणून वापरल्या जाऊ लागल्या. या कंपन्यांना केवळ एक महिन्याची तात्पुरती परवानगी देण्यात आली होती, ज्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य होते. मात्र, मुदत संपूनही या कंपन्यांनी ना कागदपत्रे सादर केली, ना पेट्रोल गाड्यांचा वापर थांबवला.
आतापर्यंत केवळ चालकांवर दंड आकारला जात होता. मात्र, आता थेट कंपन्यांच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्याची कठोर भूमिका सरकारने घेतली आहे.







