बिहार: बिहारमधून एक धक्कादायक (Crime News) आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. सख्ख्या मामानेच आपल्या भाच्याची सुपारी देऊन हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मामाचे अनैतिक संबंध भाच्याला समजल्यानंतर भीती आणि संशयातून हा खून करण्यात (Bihar News) आल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. या प्रकरणी मुख्य आरोपीसह चार जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील नाथनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मस्कन बरारी परिसरात घडली आहे. मृत मुलाचे नाव अभिषेक असून त्याचा मामा संतोष असे आरोपीचे नाव आहे. संतोष हा विवाहित असून त्याचे दोन मुलींशी अनैतिक संबंध होते. या दोघींपैकी एका मुलीचे अभिषेकशीही संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. याच कारणामुळे अभिषेकला मामाचे प्रेमसंबंध माहीत झाले होते.
अभिषेकने याबाबत संतोषला धमकावण्यास सुरुवात केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यामुळे संतोष घाबरला आणि त्याने अभिषेकचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. मात्र स्वतः खून न करता, त्याने काही गुंडांना अभिषेकची सुपारी दिली. त्यानुसार चार जणांनी मिळून अभिषेकवर हल्ला केला. करवत, ब्लेड आणि चाकू यांसारख्या धारदार शस्त्रांचा वापर करून अत्यंत निर्दयपणे त्याची हत्या करण्यात आली. हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.
घटनास्थळी रक्त दूरवर पसरू नये यासाठी आरोपींनी मृतदेहाखाली प्लास्टिक शीट टाकली आणि नंतर तेथून पळ काढला. दरम्यान, अभिषेक घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तपास सुरू असताना संशयाची सुई मामाकडे वळली आणि चौकशीत संपूर्ण प्रकार उघड झाला.
या प्रकरणात मुख्य आरोपी संतोषसह चार जणांना अटक करण्यात आली असून सर्वांवर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे अभिषेकच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात खळबळ उडाली आहे.







